Newly Wed Bride Sucide लग्नाच्या तिसऱ्याच दिवसापासून हुंड्याच्या शिल्लक रकमेसाठी शिवीगाळ; २ महिन्याच्या आत नववधूने केली आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात धक्कादायक घटना समोर आली असून, हुंड्याच्या रकमेसाठी नवविवाहितेला सासऱ्याच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने लग्नाच्या अवघ्या ५५ व्या दिवशी तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नवविवाहितिच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून सासऱ्याच्या मंडळींवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मनमाड येथे राहणाऱ्या आरती अरुण सोनवणे (२४) या तरुणीचे वैजापूर शहरातील बन्सीलालनगर येथे राहणाऱ्या वैभव नागनाथ दाभाडे याच्यासोबत १९ डिसेंबर २०२१ रोजी विवाह पार पडला होता. यावेळी लग्नात ६ लाख रुपये हुंडा देण्याचे ठरलं होतं. त्याप्रमाणे आरतीच्या कुटुंबाने ५ लाख रुपये दिले होते, तर १ लाख शिल्लक राहिले होते. त्यामुळे शिल्लक १ लाखासाठी लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी आरतीच्या सासऱ्याच्या लोकांकडून तिला शिवीगाळ करत माहेरच्या मंडळीकडून पैसे आणण्यासाठी वाद घालण्यात आला. 
त्यानंतरही हुंड्याच्या रक्कमेसाठी आरतीला सतत त्रास सुरुच होता. तसेच पती वैभग हा सुध्दा दारु पिऊन मारहाण करत असल्याने आरतीने याबाबत अनेकदा माहेरच्या लोकांना वेळोवेळी कळवले. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी पुन्हा आरतीने आपल्या आईला फोन करून आपल्याला खूप त्रास दिला जात असून, मला इथं राहायचं नसल्याचं सांगितले. त्यामुळे माहेरच्या लोकांनी आरतीच्या सासऱ्याच्या इतर नातेवाईकांना फोन करून याबाबत माहिती दिली. पण दुसऱ्या दिवशी आरतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.
त्यामुळे याप्रकरणी आरतीचा चुलत भाऊ विनय सोमनाथ सोनवणे याने वैजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरतीचा पती गौरव नागनाथ दाभाडे, सासरा नागनाथ शंकर दाभाडे,सासु निर्मला नागनाथ दाभाडे, दिर सौरभ नागनाथ दाभाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.