दरम्यान, ‘टीईटी’ घोटाळ्याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, बोगस सर्टिफिकेट घेऊन शिक्षण सेवेत रुजू झालेल्या या नकली मास्तरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे..
2019-20 मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण 16,592 परीक्षार्थींना पात्र झाले होते. सायबर पोलिसांनी निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7800 परीक्षार्थी अपात्र असल्याचे समोर आले.
टीईटी परीक्षेतील पहिला पेपर 1 लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 10,487 जण पात्र ठरले होते. तसेच 1 लाख 54 हजार 596 जणांनी परीक्षा दिली होती. पैकी 6105 जण पात्र ठरले होते. 19 जानेवारी 2020 रोजी हा निकाल जाहीर झाला हाेता. मात्र, पडताळणीत 7800 विद्यार्थी अपात्र असताना, त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले होते.
2013 पासूनच तपासणी सुरु
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2013 पासूनच तपासणी सुरु केली आहे. त्यानुसार, शिक्षक म्हणून 13 फेब्रुवारी 2013 नंतर प्राथमिक व आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र देऊन शिक्षण सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र राज्य टीईटी परिषदेकेडे एकूण 6000 प्रमाणपत्रे जमा झाली आहेत.. ज्यांनी आतापर्यंत ‘टीईटी’ची प्रमाणपत्रे जमा केली आहेत, त्याची परिषदेकडून उलटतपासणी केली जाणार आहे. उलटतपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी दिली..
..त्यांचा पगार थांबवणार..
कोणत्याही परिस्थितीत या शिक्षकांना राज्य टीईटी परिषदेकडे आपली प्रमाणपत्रे सादर करावी लागणार आहेत. कारवाईच्या भीतीने जे शिक्षक परिषदेकडे पडताळणीसाठी प्रमाणपत्रे जमा करणार नाहीत, त्यांचा पगार थांबवला जाणार आहे. प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीमुळे या बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे.