अलिकडच्या काही वर्षात पर्यावरणाचे असंतूलन मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेऊनच आपली शेती करावी असे मार्गदर्शन हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी संवत्सर येथे आयोजित व्याख्यानातून केले.
संवत्सर येथे श्री शृंगेश्वर महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी या संस्थेच्यावतीने ‘बदलत्या हवामानुसार शेती काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री डख बोलत होते. सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, निवृत्त पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे, उपसरपंच विवेक परजणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
आपला भारत देश हा मुळातच कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. कितीही नैसर्गिक संकटे आली तरी शेतकरी शेती करणे सोडत नाही. जगातल्या संगळ्या कंपन्या बंद झाल्या तरी शेती आणि मेडिकल या दोन कंपन्या मात्र कधीच बंद होऊ शकत नाही. शेतकरी थांबला तर संपूर्ण जग थांबून जाईल असे सांगून श्री डख पुढे म्हणाले, गेल्या दहा बारा वर्षापासून उपगृहचित्राचा (सॅटेलाईट) अभ्यास करण्याचा छंद मी जोपासला आहे. मी शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्याच्या उद्देशाने मी माझे निरीक्षण सुरु केले आहे. सन २००० साली सी-डॅक हे संगणकाचे प्रशिक्षण मी घेतले. या प्रशिक्षणानंतर संगणकावर उपग्रह बघून हवामानाचा अंदाज व्यक्त करणे सोपे झाले. त्यातून पाऊस, थंडी, ऊन, वारा, वादळ, वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक संकटे याबाबतचा अभ्यासही मी केला. मावळतीचे आभाळ लाल होणे, चिमण्यांनी मातीत आंघोळ करणे, पक्षांनी झाडावर घरटी बांधणे, विद्युत प्रकाशाच्या उपकरणांवर किडे जमा होणे, आकाशात विमानाचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज येणे अशा वेगवेगळ्या नैसर्गिक हालचालीवरुन पाऊस येणे अथवा न येणे याबाबतचा अंदाज बांधता येतो. राज्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी माझ्या ज्ञानाचा उपयोग शेती आणि शेतकरी यांच्यासाठी सुरु केला आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात WhatsApp चे सुमारे सातशे ग्रुप तयार करून त्यामाध्यमातून दोनच मिनीटात तीन कोटी लोकांपर्यंत संदेश पोहोचविले जातात.
साधारणपणे हवामानाचा अंदाज मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपण व्यक्त करतो. आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षापासूनचे अंदाज खरे ठरत आलेले आहेत. महाराष्ट्रात गांवोगांवी जाऊन शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. सततच्या अभ्यासामुळे पर्यावरणातील घटना, हवामान बदल याबाबतचा आपला चांगला अभ्यास झाल्याने असंख्य शेतकरी संपर्क साधून शेतीविषयी मार्गदर्शन घेत असतात. मी देखील विनामूल्य मार्गदर्शन करतो.
जि. प. सदस्य राजेश परजणे यांनी प्रास्ताविकातून पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज वर्तवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. सीटीसी, एटीडी, एनसीपीसी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून १९९५ पासून हवामानाविषयी ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे हीच त्यांची तळमळ असते. २०२१ मध्ये त्यांनी वर्तविलेला अतिवृष्टीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असल्याने राज्यभर त्यांचे नांव झाले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, खंडू फेफाळे, दिलीपराव ढेपले, केशवराव भाकरे, लक्ष्मणराव परजणे, मधुकर साबळे, बाळासाहेब दहे, अविनाश गायकवाड, जि. प. शाळेचे मुख्याद्यापक फय्याजखान पठाण, ग्रामविकास अधिकारी कृष्णदास अहिरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात श्री डख यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. लक्ष्मणराव साबळे यांनी आभार व्यक्त केले.