जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रम मंगळवार (दि.१५) रोजी आ. आशुतोष काळेंच्या हस्ते शुभारंभ
कोपरगाव प्रतिनिधी :- महायुती शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व जलसंवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असणाऱ्या जलसंपदा विभागाच्या ‘जलसंपदा व्यवस्थापन कृती पंधरवडा’ कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार (दि.१५) रोजी माजी आमदार अशोकरावजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जल व्यवस्थापनाच्या शाश्वत योजना राबवून नागरीकांमध्ये जल साक्षरतेचे महत्व पटवून देण्यासाठी व जल संपदा विभागाच्या विविध सेवा योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येतो याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी महायुती शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने दि.१५ ते दि.३० एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा’कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी ११.०० वा.आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा’ कार्यक्रमात नागरिकांमध्ये जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबवणे यासाठी समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे. विशेष मोहीम स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या लोकाभिमुख उपक्रमात सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव येथे नागरीकांनी सकाळी ११.००वा. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.